रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील १५ हजार शेतकऱ्यांना कृषी, पशुसंवर्धन, आरोग्य, तसेच आपत्ती व्यव्यस्थापन विभागामार्फत विविध प्रकारच्या योजना, शेती-पशुपालनाची तांत्रिक माहिती, सामाजिक उपक्रम, रोजगार आदींसह अन्य आवश्यक माहिती ध्वनिसंदेशामार्फत देण्याचा उपक्रम नुकताच सुरू झाला. रिलायन्स फाउंडेशन माहिती सेवा (रत्नागिरी) आणि रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविला जात आहे. निःशुल्क हेल्पलाइनशी संपर्क साधून शेतकरी ही माहिती मिळवू शकतात.
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या हस्ते १३ ऑगस्टला या उपक्रमाची सुरुवात झाली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजय सूर्यवंशी यांचे सहकार्य या उपक्रमाला लाभले आहे. या शेतकऱ्यांना शेती, पशुपालनविषयक तांत्रिक माहिती, शासकीय योजना, रोजगार आदींबद्दलची माहिती ध्वनिसंदेशांमार्फत दिली जाणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी १८०० ४१९ ८८०० या रिलायन्स फाउंडेशनच्या निःशुल्क हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सोमवार ते शनिवार या कालावधीत सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेसात या वेळेत ही हेल्पलाइन खुली असेल, अशी माहिती रिलायन्स फाउंडेशनचे जिल्हा व्यव्यस्थापक राजेश कांबळे यांनी दिली.
या कार्यक्रमाला रिलायन्स फाउंडेशनचे कार्यक्रम सहायक विनोद गवाणकर व विक्रम जाधव उपस्थित होते.